GSDAGSDAGSDA

Akola-District

अकोला जिल्हा

प्रस्तावना:

अकोला जिल्हा विदर्भाच्या पश्चिम भागात असुन पूर्व आणि उत्तरेला अमरावती, दक्षिणेला वाशिम आणि पश्चिमेला बुलढाणा जिल्हा आहे. हा जिल्हा ७ तालुक्यांमध्ये विभागलेला असुन अकोला हे त्याचे जिल्हा मुख्यालय आहे. ४ महसूल उपविभाग असुन अनुक्रमे  अकोला, बाळापूर, अकोट आणि मूर्तिजापूर येथे आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यानुसार जिल्हा मुख्यालयात जिल्हा परिषद आणि प्रत्येक तहसील स्तरावर पंचायत समितीची समांतर रचना स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ५४३२ चौरस किमी आहे आणि २००१ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १६,३०,२३९ (३८.४९% शहरी) आहे.

जिल्ह्यात एकूण ९१४ गावे आहेत, ज्यामध्ये शहराचा समावेश आहे. जिल्हा मुख्यालय येथे महानगरपालिका आणि अकोट, तेल्हारा आणि मूर्तिजापूर येथे नगरपालिका आहेत. जवळजवळ सर्व गावांचे विद्युतीकरण झालेले आहे.आणि प्रत्येक गाव कच्च्या/पक्क्या रस्त्याने जोडलेले आहे. जिल्ह्याच्या सर्व भागात एकूण रस्त्यांचे जाळे चांगले आहे. याशिवाय, अकोला रेल्वेने जोडलेले आहे. ते पूर्व-पश्चिम दिशेने जाणारे हवाडा-मुंबई (सीएसटी) ट्रॅकवर आणि वायव्य-दक्षिण दिशेने अजमेर-काचीगुडा मार्गावर येते. अकोला हे जंक्शन ठिकाण असल्याने, प्रवाशांसाठी तसेच माल वाहतुकीसाठी ते खूप महत्वाचे आहे.

भौगोलिक रचना:

अकोला जिल्हा २०° १८′ आणि २१° १३′ उत्तर अक्षांश आणि ७६° ४१′ आणि ७७° ३७′ पूर्व रेखांश दरम्यान आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या (S.O.I.) टोपोशिट क्र. 55/C/16, 55/D/4 ,55/D/13, 55/H/1, 55/H/7 मध्ये समाविष्ठ आहे. उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा असुन त्याचा उतार दक्षिणेकडे आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा सपाट आहे तर दक्षिणेकडील भाग उंचवट्याचा आहे आणि त्याचा सामान्य उतार उत्तरेकडे आहे. पूर्णा ही जिल्ह्याची प्रमुख नदी आहे आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते. काटेपुर्णा, विद्रुपा, शहानूर, वान, मन, मोर्णा आणि निर्गुणा ह्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. या नद्यांमध्ये सर्वसाधारणपणे डेंड्रिटिक पॅटर्न दिसुन येतो.मात्र उत्तरेकडिल भागात अर्ध समांतर ड्रेनेज पॅटर्न दिसुन येतो.

उत्तरेकडिल भूभाग हा सातपुडा पर्वत रांगांचा असुन  उंच शिखर वन क्षेत्र व बेसाल्टिक खडकाने व्यापलेला आहे.या भूभागाची समुद्र सपाटीपासुन उंची 750 ते 1020 मिटर इतकी आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा गाळाने व्यापलेला असुन समुद्र सपाटीपासुन उंची 250 ते 270 मिटर इतकी आहे. हा मुख्यत्वे करुन साठवणुक प्रदेश आहे.हा भूभाग टोळगोटे व वाळु मिश्रीत गाळाने व्यापलेला आहे.गाळाची खोली जमिनिपासुन सर्वसाधारणपणे 300 मिटर पर्यंत आहे. दक्षिणेकडिल भाग बालाघाट पठाराचा असुन बेसाल्टिक खडकाने व्यापलेला आहे..या भूभागाची उंची 300 ते 400 मिटर आहे.

भूशास्त्रीय रचना:

जिल्ह्याची भूशास्त्रीय रचना दोन भागात वर्गीकृत करता येते.सर्वात जुने अप्पर क्रिटीशिअस ते पॉलीओसिन या कालखंडातील 65 दश लक्ष वर्षा अगोदरचे बेसाल्ट खडक आहे. त्यानंतर तापी पुर्णा नदीमुळे निर्माण झालेला गाळाचा प्रदेश,यालाच पुर्णा नदीचा गाळाचा प्रदेश म्हणतात. पुर्णानदीच्या गाळाच्या प्रदेशात टोळगोटे, वाळु, माती व कंकर  वेगवेगळ्या थराप्रमाणे आहेत. पुर्णा नदीच्या काठावर उत्तर आणी दक्षिण दोन्ही बाजुने साचलेली चिकन माती आणि गाळाचा थर असुन हा भाग खारपानपट्टा म्हणुन संबोधल्या जातो. या भागात वाळु व कंकर चा थर कमी प्रमाणात आढळतो.याची जाडी 300 मिटर पेक्षा जास्त आढळुन येते. शासनाने नेमलेल्या उच्चाधिकार समितीमध्ये मान्यता प्राप्त खारपानपट्ट्यात जिल्ह्यातील एकुण 373 गावांचा समावेश आहे. सातपुडा पर्वत रांगा आणि खारपानपट्टा यांच्या मध्ये असलेला गाळाचा थर टोळगोट्यांचा असुन त्यात गोड पाण्याचे साठे आढळतात. यालाच बझाडा झोन असे संबोधतात.जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भाग हा बेसाल्ट खडकाने व्यापलेला असुन एका थराची जाडी 20-30 मिटर आहे. खालचा थर कठिण व वरचा थर सछिद्र आढळतो.सछीद्र खडकावर सर्वसाधारणपणे मुरुमाचा 2-5 मिटरचा थर आढळतो.

जिल्ह्यात काही ठिकाणी लाव्हा रसाचे थर हे लालमातीने वेगळे केलेले आहेत. त्याला     सामान्यत: रेडबोल संबोधतात. त्याची जाडी ठिकाणानुसार व भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत जाते. लाव्हा थराची सरासरी जाडी 10-15 मिटर पर्यंत आढळुन येते.परंतु काही ठिकाणी खुप जास्त प्रमाणात दिसुन येते.जिल्ह्याच्या वायव्य कोप-यात एका छोट्या भूभागात गोंडवाणा सॅंड स्टोन आढळुन येतात.

भूजल उपलब्धता:

जिल्ह्यातील पुर्णा गाळाचा आणि बेसाल्ट या खडकाने व्यापलेल्या भूभागात भूजलीय परिस्थिती वेगवेगळी आहे. पुर्णा गाळाच्या क्षेत्रात, पाण्याची पातळी तुलनेने खोल असुन भूजल हे कन्फ़ाईंड व अनकन्फ़ाईंड परिस्थितीत आढळून येते. मुख्यत्वे या भूभागात  बारीक ते मध्यम वाळू, मोठ्या स्वरुपातील वाळू आणि टोळगोटे असलेला जलधारक खडक आढळुन येतो.भूजल पातळी १२.५० ते १४.५० मीटर पर्यंत असुन  आणि विहीर/ट्यूबवेलची क्षमता प्रतिदिन ५० ते १०० मीटर पर्यंत असते. सदरचा जलधारक हंगामी व काही ठिकाणी बारमाही आहे. पुर्णा नदीच्या काठावर उत्तर आणि दक्षीण बाजुने गाळयुक्त आणि चिकणमाती असल्याने या पट्ट्यातील भूजल हे खारे आहे. म्हणुन याला खारपानपट्टा म्हणतात. याचि व्याप्ती  ५ वेगवेगळ्या तालुक्यांतील ३७3 गावांत आहे.

बेसाल्ट या खडकाने व्यापलेल्या भूभागात , सछीद्र,सांधे,भेगायुक्त विघटित   जलधारक खडक आहे.यात प्रामुख्याने भूजल आढळते.या खडकात आढळणारे भूजल हे त्या खडकाची आंतरिक जोडणी छिद्रांची लांबी रुंदी व झिज  यावर अवलंबुन आहे. उथळ जलधारक खडक हा अनकन्फ़ाईंड  किंवा सेमीकन्फ़ाईंड आहे. तर अति खोलिवरिल खडक सेमीकन्फ़ाईंड स्वरुपाचा आहे. साधारणता फ़्रिएटिक ॲक्वीफ़र  ७  ते ८.५० मीटर पर्यंत असते आणि क्षमता १८ ते ७२ घनमीटर प्रतिदिन या दरम्यान दिसुन येते. विहिर व विंधण विहिरीची क्षमता ठिकाणानुसार व भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी दिसुन येते.

इतिहास:

ऐतिहासिकदृष्ट्या अकोला जिल्हा विदर्भाच्या इतर भागांप्रमाणे  अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट होता. सुरवातीला अकोला जिल्हा हा उत्तर बेरारचा एक भाग होता ज्याचे मुख्यालय  बुलढाणा होते.परंतु सन १९०३ मध्ये अकोला उत्तर बेरारचे मुख्यालय बनले. दिनांक २८ नोव्हेंबर १८०३ रोजी गव्हर्नर आर्थर वेलेस्ली यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश आणि नागपूरच्या भोसले यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांच्या सैन्यात दुसऱ्या अँग्लो-मराठा युद्धादरम्यान अरगाव (अकोटजवळील अडगाव) ची लढाई झाल्याचे ऐतिहासिक घटनेत नमुद आहे. हा भाग सन 1856 मध्ये  ब्रिटीश राजवटित व त्यानंतर निजामशाहीत समाविष्ठ झाला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मिति पासुन हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात आहे.

अकोला जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये अकोला किल्ला,अकोट किल्ला,बाळापूर किल्ला  नरनाळा किल्ला असे अनेक किल्ले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाळापूर किल्ला आजही सुस्थितीत असुन या किल्ल्याच्या परिसरात महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत. तथापि, इतर किल्ल्यांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारकडून नरनाळा किल्ल्याचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण केले जात आहे.

संस्कृती आणि धर्म:

अकोला येथील राज राजेश्वर मंदिर हे भगवान शिवभक्तांसाठी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि त्याला एक महान ऐतिहासिक वारसा आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील नरसिंह महाराज मंदिर आणि बाळापूर येथील बालादेवी मंदिर धार्मिक स्थळे म्हणुन प्रसिद्ध आहेत. तसेच बाळापूरमध्ये राजा जयसिंग यांनी त्यांच्या घोड्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बनवलेले “छत्री” स्मारक देखील प्रसिद्ध आहे.

अकोला हे अनेक सणांमुळे रंगीबेरंगी शहर म्हणून ओळखले जाते. अकोला जिल्ह्यात राहणारे लोक विविध जाती आणि समुदायाचे आहेत. गणेश चतुर्थी, मकर संक्रांती, दसरा, दिवाळी, होळी आणि ईद हे सण विशेष उत्साहाने साजरे केले जातात.

जिल्ह्यातील महत्वाची ठिकाणे:

जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून उष्ण झरे आढळत नाहीत आणि संपूर्ण परिसर भूकंपाच्या घटनांपासून सुरक्षित आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात दीर्घकाळाचे नैसर्गिक झरे क्वचितच आढळतात.

प्रतिकूल भौगोलिक रचना आणि खराब भूजलीय स्थिती असलेली काही गावे वगळता जिल्ह्याच्या सर्व भागात पिण्याच्या पाण्याची स्थिती एकंदरीत समाधानकारक आहे.

क्षारयुक्त प्रदेशातील मोठ्या संख्येने गावे प्रादेशिक पाईप पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट आहेत. या पट्ट्यात गोड पाण्याची उपलब्धता नसल्याने काही दिवस कोणत्याही कारणास्तव पाणीपुरवठा योजना बिघडल्यास या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते.

Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.