कोल्हापूर बद्दल –
कोल्हापूरची देवी अंबाबाई (महालक्ष्मी) महाराष्ट्राचे आद्य दैवत मानले जाते. संस्थान काळापासून थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी कार्य केले. पन्हाळा, जोतिबा, विशाळगड, नृसिंहवाडी आणि बाहुबली आदी पर्यटनस्थळे भारताच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांना आकर्षित करतात. वारणा, भारतातील पहिले वायर्ड गाव हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांचे वर्चस्व आहे. कुस्ती क्षेत्रात कोल्हापूरच्या मल्लांचा आजतागायत दबदबा आहे. संगीत, चित्रकला आणि चित्रपट यांसारख्या ललित कलांचे माहेरघर असलेले कोल्हापूर आजही औद्योगिक नवकल्पनांमध्ये आघाडीवर आहे. सुमारे शतकापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे बारमाही पाणी उपलब्धतेच्या बाबतीत देशातील मोजक्या जिल्ह्यांपैकी कोल्हापूर जिल्हा हा एक आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेला सांगली, वायव्येला रत्नागिरी, नैऋत्येला सिंधुदूर्ग व दक्षिण आणि पूर्वेला बेळगाव जिल्हा आहे. भौगोलिक दृष्ट्या उत्तरेकडील वारणा नदी कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा यांच्यात एक सामायिक सीमा तयार करते; ईशान्येकडील कृष्णा नदी व कोल्हापूरच्या मध्यभागातून वाहणारी दुधगंगा नदी कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातून वाहतात. तसेच पश्चिमेला असणा-या सह्याद्री पर्वतरांगा कोल्हापूर जिल्ह्यास रत्नागिरीपासून वेगळे करते.
१ | जिल्ह्याचे नाव | : | कोल्हापूर |
2 | क्षेत्रफळ | : | ७६८५ चौ.कि.मी. |
3 | उपविभाग | : | 06 (करवीर, गडहिंग्लज, राधानगरी, इचलकरंजी, पन्हाळा, भुदरगड) |
4 | तालुके | : | 12 (करवीर, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, हातकलंगले, शिरोळ, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, गगनबावडा, आजरा, चंदगड) |
५ | लोकसंख्या | : | एकूण-38,76,001 पुरुष-19,80,658 महिला-18,95,343 |
6 | सिंचन प्रकल्प | : | मोठे प्रकल्प – 4 (राधानगरी, तुळशी, दूधगंगा, वारणा) मध्यम प्रकल्प -10 लहान -82 |
७ | मुख्य पिके | : | ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग |
पाऊस आणि हवामान –
जिल्ह्यामध्ये नैऋत्य तसेच ईशान्य मान्सूनचा पाऊस पडतो. जुलै महिण्यात संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान होते. कोल्हापूर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1963.60 मिमी आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. कोल्हापूर जिल्हा शाश्वत पर्जन्यक्षेत्रात येतो. पर्जन्यमानाबाबत वर्षांच्या मालिकेतील पावसाच्या परताव्याच्या आधारे, तीन व्यापक विभागांची व्याख्या केली जाऊ शकते;
(i) पश्चिम विभाग- गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, भुदरगड, शाहूवाडी, चंदगड आणि आजरा या तालुक्यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागामध्ये 1665.23 मिमी ते 5597.67 मिमी इतके वार्षिक सरासरी पर्जन्यमान होते.
(ii) मध्य विभाग – करवीर, गडहिंग्लज आणि कागल तालुक्यांचा समावेश मध्यम व नियमित पाऊस असलेला मध्य विभागात होतो, ज्यामध्ये सुमारे 871.52 मिमी ते 1071.71 मिमी इतके वार्षिक सरासरी पर्जन्यमान होते.
(iii) पूर्व विभाग – हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांत अनियमित आणि अनिश्चित पाऊस होतो, ज्यामध्ये जास्तीत जास्त 746.15 मिमी आणि किमान 644.21 इतके वार्षिक सरासरी पर्जन्यमान होते.
सह्याद्री पर्वतरांगामध्ये असणारा कोल्हापूरचा पश्चिम भाग एप्रिल आणि मे महिन्यातही पूर्व भागाच्या तुलनेत थंड असतो. दुपारच्या वेळी सुरू होणाऱ्या आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या समुद्राच्या वाऱ्याच्या प्रभावामुळे संपूर्ण जिल्ह्यातील रात्री सामान्यतः थंड असतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात वर्ष खालीलप्रमाणे तीन कालखंडात विभागले जाऊ शकते,
- उष्ण हवामान कालावधी- मार्च ते मे
- पावसाळा- जून ते ऑक्टोबर
- थंडीचा कालावधी- नोव्हेंबर ते फेब्रुवारी
भौगोलीक रचना –
कोल्हापूर जिल्हाच्या भूशास्त्रिय रचनेचा विचार करता जिल्ह्याचा भूभाग मुख्यत्वे बेसाल्ट या अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे.
कोल्हापूर जिल्हा दख्खनच्या पठारावर वसला असून सरासरी 1,800 फूट समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा त्याची पश्चिम सीमा चिन्हांकित करते. जिल्ह्यामध्ये अनेक डोंगररांगा आहेत ज्या सह्याद्रीपासून पूर्वेकडे आणि ईशान्येकडे पसरलेल्या आहेत, ज्यात सपाट पठारे आहेत, जे लाव्हा रसापासून बनलेल्या भू- रचनेचे वैशिष्ट्य आहे. सदर डोंगररांगा 1,000 ते 1,500 फूट उंचीवर असून लाव्हा रसाच्या आडव्या थरांचे दीर्घकालीन झीज झालेने तयार होतात. पायऱ्यांसारखे टप्पे आणि सपाट पठार, ज्यावर अनेकदा झीज झालेला जांभा खडक (लॅटेराइट) आच्छादित आहे, हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. या भौगोलीक रचनेला (लॅंडस्केप) ‘ट्रॅप’ टोपोग्राफी म्हणून ओळखले जाते. आजरा तालुक्यातील काही भागांत भूगर्भात खडकाचा प्रकार बदलल्यामुळे भौगोलीक रचनेत थोडे बदल दिसून येतात.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट रचनेवर सह्याद्री पर्वत रांगांचा प्रभाव आहे, जो पूर्व आणि पश्चिम प्रवाहांना विभाजित करतो. पश्चिम वाहिनी नदी वेगाने वाहत कोकणात पोहोचल्यानंतर संथ होते, तर वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि हिरण्यकेशी या पठारी नद्या जिल्ह्यातून कृष्णा नदीकडे वाहतात. या नद्या विविध दिशांमध्ये मार्गस्थ होऊन अंतिमतः कृष्णा नदीस मिळतात. नद्यांना येणा-या पुरांमुळे, सुपीक मैदाने तयार होतात. कृष्णा नदी पुराच्या पाण्याचा निचरा करते ज्यामध्ये पंचगंगा व उपनद्या समाविष्ठ होतात, तसेच जिल्ह्याच्या सिमा चिन्हांकीत करतात.
पर्वतरांगा–
सह्याद्रीचा उंच कडा आणि माथा –
कोल्हापूर जिल्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगानी व्यापलेला असून पश्चिम घाटमाथ्याची उंची 2,000 ते 3,300 फूट इतकी आहे. पश्चिम घाट पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील पाणलोटांचे विभाजन करते. पश्चिम घाट विशिष्ट वातावरणीय बदलामुळे क्षीण झाला आहे, ज्यामुळे पश्चिम घाटात विच्छेदित टेकड्या व पर्वतरांगा पूर्वेकडे पसरल्याचे अढळून येते. पश्चिम घाटावर त्रोटक पाणलोट असून त्यांची वहनाची दिशा ही कोकण प्रदेशाकडे आहे. पश्चिम घाटाच्या विशिष्ट रचनेमुळे मान्सूनचा पाऊस चांगला पडतो. विशाळगड-पन्हाळा पर्वतरांगा आणि फोंडा-सांगाव पर्वतरांगा यांसारख्या पूर्वेकडील पर्वतरांगांमध्ये सपाट शिखरे व सुपीक खो-यांमुळे मानवी वसाहती आहेत. मध्य आणि दक्षिणेकडील पर्वतरांगा, जसे की कागल आणि भुदरगड पर्वतरांगा, समान वैशिष्ट्ये दर्शवितात व अधिक झीज झालेल्या आहेत. दख्खनच्या लाव्हारसापासून तयार झालेल्या डोंगररांगा, गोलाकार शिखरे, रचनात्मक पाय-यांमुळे विरळ लोकसंख्या सदर ठिकाणी दिसून येते. टेकडी व खोऱ्याच्या मधील भागात सुपीक शेती अढळून येते.
भूशास्त्रीय रचना –
कोल्हापूर जिल्ह्याची भूशास्त्रीय रचना भूशास्त्रीय काल चक्रानुसार खालीलप्रमाणे आहे-
भूशास्त्रीय रचना | भूशास्त्रीय काल चक्र |
माती आणि झिजलेला जांभा खडक (लॅटेराईट) | Recent and Sub-Recent. |
बेसाल्ट (आग्निजन्य खडक) | Lower Eocene. |
कलादगी (स्तरित खडक) | Precambrian. |
ग्रानाईट- निस (रुपांतरीत खडक) | Archaean. |
कोल्हापूर जिल्ह्यात भूशास्त्रिय रचनेत आग्निजन्य, स्तरित व रुपांतरीत खडक अढळतात. अग्निजन्य खडकाच्या प्रकारात मुख्यत्वे बेसाल्ट आढळतो.
रुपांतरीत खडकाच्या प्रकारात आर्कियन धारवाड भूशास्त्रीय कालखंडातील फ़ीलाईट्स आणि अँपीबोल या खडकांचा समावेश आहे. या खडकांवर लोअर कलादगी या मालीकेतील काँग्लोमेरेट्स, क्वार्टझाइट्स व शेल्स प्रकारचे खडक अढळतात. लोअर कलादगी या मालीकेतील खडकांवर दख्खनचे पठार असून लाव्हा रसाच्या थरांपासून तयार झाले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात झीज झालेला जांभा खडक आढळतो तसेच पश्चिम घाटाचा काही भाग बॉक्साइटने समृद्ध आहे. कलादगी सॅंडस्टोन, क्वार्टझाइट्स आणि बेसाल्ट यासारखे खडक बांधकामात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. जिल्ह्यात आढळणा-या गड- किल्ल्यांमध्ये बांधकामाकरीता जांभा खडक (लॅटेराइट) वापरल्याचे दिसून येते. जिल्ह्यात तांबे, जिप्सम, लोह आणि केओलिनचे छोटे साठेही आहेत; परंतु, त्यांचे आर्थिक मूल्य नगण्य आहे.
जलशास्त्र-
दख्खनचे पठार (डेक्कन ट्रॅप) –
बेसाल्टिक भूप्रदेशात, कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये, झीज झालेल्या, सांधे व तुटलेल्या कठीण खडकांत आणि झीज झालेल्या सच्छिद्र खडकांत भूगर्भात पाणी उथळ व काहीसा अनिश्चित जलधरात 15 मीटर खोलीपर्यंत मर्यादित परिस्थितीत आढळते. विंधन विहिरींच्या निरिक्षणावरुन कठीण बेसाल्ट आणि रेड बोल यांच्या खाली खोल जलधरात भूजल आढळते. जांभ्या खडकाच्या (लॅटेराइट) पठारांमध्ये सर्व साधारणपणे भूगर्भात 15 ते 20 मीटर खोलीपर्यंत पाणी पातळी असून या भागातील विहिरींच्या पाणी पातळीत पावसाळ्यानंतर झपाट्याने घट दिसून येते. जांभ्या खडकाच्या (लॅटेराइट) सच्छिद्रतेमुळे विहिरीमधून उन्हाळ्यात अल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होते.
जांभा खडक –
कोल्हापूर जिल्ह्यात आढळणा-या जांभा खडकास (लॅटेराइट) सच्छिद्रता चांगली आहे. जांभ्या खडकाच्या पोकळ्या, सांधे आणि तुटलेल्या भेगांमधून पाणी झिरपते. जांभ्या खडकाच्या तळाशी “लिथोमर्जिक” प्रकारची माती आढळते व सदर माती भूजल झिरपण्यास प्रतिकुल असल्याने भूगर्भातील पाणी समांतर वाहते व झ-यांद्वारे बाहेर पडते.
गाळाचा भूभाग-
कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या सखल भागात गाळाचा भूभाग आढळतो. तसेच, डोंगराळ भूभागामुळे इतर ठिकाणी अत्यल्प प्रमाणात गाळाचा भूभाग आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या किनाऱ्यावर 3 मीटर ते 5 मीटर जाडीचा गाळाचा थर दिसून येतो. गाळाच्या भूभागामध्ये गाळाच्या खाली झिज झालेला बेसाल्ट खडक आढळतो सदर गाळात दगडाचे तुकडे, माती व सिलीका आढळते.
गाळाच्या प्रदेशात वालुकामय थरामुळे भूजल उपलब्धता चांगली आहे. परंतु गाळातील माती आणि वाळूच्या प्रमाणावर भूजलाची उपलब्धता अवलंबून आहे.